(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण)
तपस्येमुळे जीवन पुनीत होते.
इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले.
स्वतः चाकरीमध्ये बुडून गेले आणि देशही बुडाला. असे लोक भारतात पुन्हा निर्माण व्हायचे नसतील तर तपस्या हवी.
एखाद्या ध्येयासाठी दिवसरात्र परिश्रम करणे म्हणजे तपस्या. तपस्येसाठी लागणारी शक्ती प्रतिज्ञेतून येते.
टिळक, आगरकर डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना परस्परांशी चर्चा करत. त्यातून त्यांच्या देशसेवेच्या प्रतिज्ञा झाल्या. ज्यांनी सगळे आयुष्य देशसेवेला वाहिले ते मेले का अमर झाले? तुम्ही unsung hero राहाल किंवा सामर्थ्याने तळपाल.
प्रतिज्ञा घेऊन काम केल्यावरही तुमच्याकडे लक्ष्मी येऊ शकते. टिळकांना गायकवाड वाडा मिळाला. जनतेने त्यांना हजारो रुपये दिले. ऐहिक उत्कर्षासाठी सुद्धा प्रयत्न हवेत, प्रतिज्ञा हवी.
क्रांतिकारकांसाठी आद्य, अन्त्य अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या प्रतिज्ञा असत. तेव्हा गुप्तपणे पारखून घ्यावे लागायचे. पुढची पुढची प्रतिज्ञा घेण्याआधी कठोर शारीरिक कसोट्या असत. आता सर्वव्यापी संघटना करायची आहे. क्रांतिकारकांच्या इतकी अवघड मांडणी नको.
सर्वव्यापी संघटन म्हटले तरी असा विचार करणारे थोडेच असणार. दहा टक्के तरी भारतीयांनी हा विचार आत्मसात केला पाहिजे. व्यापक संघटना करायची असेल तर फार तीव्र तपस्या नको.
‘माझ्याचसाठी फुललो न मी हे’ हा विचार मनात रुजण्यासाठी प्रथम प्रतिज्ञा घ्यायला हवी.