- प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्याप्रमाणे वागणे जमले नाही तर काय होते ?
आळस, कंटाळा, व्यावहारिक अडचणी, संशय, शंका अशा अनेक कारणांमुळे आपण हाती घेतलेले राष्ट्रसेवेचे काम थांबू शकते. प्रतिज्ञेची रोज आठवण ठेवली तर असे खंड पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रतिज्ञा केली आहे या आठवणीने खंड पडला तरी काम पुन्हा सुरू करता येते; प्रतिज्ञाग्रहण आणि प्रतिज्ञा-स्मरण यामुळे आपली इच्छाशक्ती वाढू शकते. इच्छाशक्ती – म्हटलेले खरे करून दाखविण्याची शक्ती – वाढणे हे व्यक्तिमत्त्व विकसनाचे लक्षण आहे. प्रतिज्ञेमुळे आपल्या सर्व शक्ती एकवटायला एक आधार किंवा केंद्रबिंदू आपल्या मनात तयार होतो. त्याची मदत घेऊन सर्व शक्ती एकवटण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. यात अपयश आले तर पुन्हा प्रयत्न सुरू करायचे.
- अनेकजण प्रतिज्ञा घेऊन ही त्याप्रमाणे वागताना दिसत नाहीत. मग मी प्रतिज्ञा घेतल्याचा काय उपयोग आहे ?
इतरांचे पाहून प्रतिज्ञा घेऊ नये. स्वत:ला वाटेल तेव्हाच घ्यावी. म्हणजे प्रतिज्ञा घेतल्यावर बाकीचे काय करतात इकडे लक्ष जात नाही. प्रतिज्ञा घेतल्यामुळे प्रबोधिनीत कोणतेच लाभ, सोयी, सवलती, अधिकार, पद मिळत नाही. स्वत:चे व्यक्तिमत्त्व सदिश करण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी.
**************************************************************************************************************